भल्या पहाटे स्वप्न संपता, अलगद येते जाग
जागृत मन मग घेऊ लागते, त्या स्वप्नाचा माग
क्षणात पुढती उभा राहतो, आठवणींचा गाव
दाटून येती पुन्हा नव्याने, जुनेच हळवे भाव
कधी आनंदी कधी विनोदी, दुःखाचे कधी सूर
हसता हसता कधी अचानक, भरून येतो ऊर
जुनेच सारे हवे वाटते, मार्ग काही दिसेना
आनंदासह भयही दिसते, मेळ काही बसेना
काय हवे अन काय नकोसे, माझे मला कळेना
संभ्रमातल्या अर्जुनास या, कृष्ण काही मिळेना
मलाच आता लागत नाही, माझ्या मनीचा ठाव
मग मी अलगद मिटून घेतो, आठवणींचा गाव